मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. ही थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची घोषणा केली होती. आता उद्धव ठाकरे यांनी मख्यमंत्रिपदाची सत्रे हाती घेतल्यानंतर ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महागाई लक्षात घेता दहा रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास ५० रुपयांचा खर्च येणार आहे. उर्वरित ४० रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा मुद्दा या प्रस्तावात असल्याचे समजते आहे. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणारे आहे.
शिवसेनेची १० रुपयांच्या थाळीसाठी तयारी सुरु